Pahalgam Terror Attack : मंगळवारी दुपारी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. (Pahalgam Terror Attack)या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म कोणता असं विचारून गोळ्या घातल्या. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील दोन पर्यटकांचा या हल्ल्यात बळी गेला. तसेच काही पर्यटक अजूनही तेथे अडकले आहेत. या सर्वांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करून त्यांना आज सायंकाळपर्यंत पुण्यात आणण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ पुढे म्हणाले, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झाले. सुदैवाने त्यांच्या पत्नी आणि मुलगी सुरक्षित आहेत. आज संध्याकाळी सहा वाजता त्यांचे पार्थिव श्रीनगरमधून पुण्यात आणले जाणार आहे. मुंबईतील मृत्युमुखी झालेल्या नागरिकांचे पार्थिव आज दुपारी बाराच्या विमानाने मुंबईला आणले जाणार आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांशी सातत्याने संपर्कात आहोत.
आज दुपारी तीन वाजता मुंबईहून श्रीनगरकडे जाणाऱ्या विशेष विमानाने अडकलेल्या लोकांना परत आणण्यात येणार आहे. पुण्यातील सुमारे दीडशे ते पावणे दोनशे नागरिकांचा एक गट काश्मीरमध्ये अडकलेला आहे. या लोकांना परत आणण्यासाठी स्वतंत्र मुंबई-पुणे विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अडकलेल्या नागरिकांशी सातत्याने संपर्कात असून त्यांना विश्वास दिला आहे की, आम्ही त्यांच्या सोबत आहोत.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आज विशेष विमानाची योजना करण्यात आली असून, यासाठी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. श्रीनगरचे जिल्हाधिकाऱ्यांशीही सातत्याने चर्चा सुरू आहे. गृह विभागाचे संयुक्त सचिव सध्या श्रीनगरमध्ये आहेत. ते मराठी असल्यामुळे विशेष मदत मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे.
हेल्पलाइन नंबर जारी..
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांचा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. ०२०- २६१२३३७१ या क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा. सर्व नातेवाइकांना आवाहन आहे की घाबरून जाऊ नका. आम्ही अडकलेल्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षितपणे परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत अशी माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.