समाजमाध्यमांवर ‘फेकन्यूज, वादग्रस्त पोस्ट आणि अफवा’ पसरवाल तर होईल कडक कार्यवाही
नांदेड दि.४: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून जिल्ह्यातील विविध समाजमाध्यमांचे शेकडो खाते दररोज तपासले जात आहेत. निवडणूक आदर्श आचारसंहिता घोषित झाल्यापासून जवळपास दोन हजार खाते तपासण्यात आले असून समाजमाध्यमांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच या महिन्यात गुढीपाडवा, रमजान ईद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, भगवान महावीर जन्म कल्याणक आणि हनुमान जयंती आदी विविध धर्मीय उत्सव साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी आणि समाजकंटकावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘सोशल मीडिया मॉनिटरींग सेल’ची स्थापना करण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांचा वापर करताना आदर्श आचारसंहितेची समाजमाध्यमांच्या ग्रुप ॲडमिनने विशेष काळजी घ्यावी, सोबतच नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती अंतर्गत असलेल्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.
सोशल मीडियावर फेक न्यूज टाकणे, अफवा पसरविणे, दिशाभूल किंवा लोकांमध्ये सभ्रम निर्माण करणारे मजकूर-पोस्ट प्रसारित करणे, खोटे विधान करणे, एखादा विशिष्ट पक्ष-संघटनेची बाजू लावून धरणे किंवा बनावट खाते तयार करुन दिशाभूल केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या दरम्यान जिल्ह्यात समाजमाध्यमावर वादग्रस्त, आक्षेपार्ह, समाजामध्ये तेढ, भिती किंवा दहशत निर्माण करणाऱ्या १७१ पोस्ट सोशल मीडिया सेलने काढल्या असून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ सोशल मीडिया मॉनिटरींग सेलच्या 8308274100 या मोबाईल क्रमांकवर माहिती देण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव आणि पत्ता गोपनीय ठेवला जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
लोकसभेच्या उमेदवारांसाठी विशेष सूचना:
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांनी समाजमाध्यमावरील त्यांची विविध अधिकृत खाती निवडणूक आयोगाकडे नोंद करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात सर्व समाजमाध्यम प्रतिनिधींनी आपल्या माध्यमांची नोंद आयोगाकडे करावी. समाजमाध्यमांवरुन अफवा पसरविणे, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे, भीतीदायक किंवा दहशत निर्माण होणाऱ्या पोस्ट, परवानगी न घेता टाकलेल्या जाहिराती इत्यादी बाबत गंभीर गुन्ह्याची नोंद होऊ शकते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी यासंबंधीची काळजी घेऊन कामकाज करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
नागरिकांसाठी काही सूचना:
या लोकसभा निवडणूक आणि जयंती-सण-उत्सवाच्या काळात आपल्या समाजमाध्यम खात्यावरुन आक्षेपार्ह प्रतिक्रिया, मजकूर टाकल्या जाणार नाही तथा आचार संहितेचा भंग होणार नाही, याची सर्व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रचाराच्या पोस्ट टाकणे, धर्म, जात, भाषा या मुद्यावरुन शेरेबाजी कारणे, तथ्यहीन बातम्या प्रसारित करणे टाळावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड