येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. यासोबतच अनेक मान्यवरांना निमंत्रणेही पाठवली जात आहेत. रामजन्मभूमी ट्रस्टच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पण, आंबेडकरांनी हे निमंत्रण नाकारत राममंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केले. आंबेडकरांनी निमंत्रण नाकारण्याचे कारणही स्पष्टपणे सांगितले आहे.
हा सोहळा भाजप आणि आरएसएसने आयोजित केल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारले. निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी राजकीय मोहिम म्हणून हा धार्मिक कार्यक्रम आखला गेला आहे, असं आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांनी ट्वीट करून याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रकाश आंबेडकर रामजन्मभूमी ट्रस्टला पत्र पाठवून कळवलं की, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मला आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. परंतु, या कथित सहोळ्यात मी सहभागी होणार नाही. कारण, भाजप आणि आरएसएसने हा सोहळा हाती घेतला आहे. हा धार्मिक सोहळा राजकीय फायद्यासाठी राजकीय प्रचार बनवला आहे. माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता की, राजकीय पक्षांनी पंथ देशाच्या वरती ठेवला तर दुसऱ्यांदा आपले स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि ते कदाचित कायमचे हिरावून जाईल. माझ्या आजोबांची भीती आज खरी ठरली. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंथाला देशाच्या वरती स्थान दिले आहे. त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशा शब्दात आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. पत्राच्या शेवटी आंबेडकरांनी जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम असा उल्लेख केला.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांनी उद्घाटनाला जाणार नसल्याचं याआधीच जाहीर केलं आहे. हा भाजपचा राजकीय कार्यक्रम असल्याने आपण जाणार नसल्याचे या नेत्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, राष्ट्रवादीचे शरद पवार हेही उद्घाटनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 8 हजाराहून अधिक मान्यवरांना अयोध्येत आमंत्रित करण्यात आले आहे. अशा भव्य सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड