विजय पाटील
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
दि.५: शहरात कचरा संकलन करणाऱ्या रेड्डी कंपनीचे कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाली असून, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेऊन शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सकाळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जी. श्रीकांत यांची भेट घेतली. प्रदेश सरचिटणीस डॉ. जफर खान, इब्राहीम पठाण, अॅड. इकबालसिंग गिल, माजी गटनेता भाऊसाहेब जगताप, डॉ. अरुण शिरसाठ, अनिस पटेल, डॉ. सरताज पठाण, मोईन इनामदार, डॉ. नीलेश अंबेवाडीकर, शेख अथर, बाबुराव कवसकर आदी उपस्थित होते. यावेळी सांगण्यात आले, की कचरा संकलन करणाऱ्या रेड्डी कंपनीकडे वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नाही. जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. वाहनचालकांकडे परवाना नाही. कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्हज्, बूट अशा कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. अनेक वॉर्डांत चार ते पाच दिवस घंटागाड्या येत नाहीत. कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करावे. कंपनीला महापालिकेने ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर