परळी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (5 डिसेंबर) ला भाषणामध्ये बोलताना उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले आम्ही पाच राज्यांच्या निवडणुक प्रचाराला गेलो त्यामुळे काहींच्या पोटात दुखले. पण आम्हाला शेजारच्या राज्यात बोलावतात, तुम्हाला शेजारच्या घरातही नाही. असं म्हणत त्यांनी टोला लगावाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज (5 डिसेंबर) बीडमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिणी भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना फडणवीसांनी ठाकरेंना आणि राऊतांना सुनावले आहे.
नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये राज्यातील भाजप आणि शिवसेनेचे नेते या पैकी अनेक राज्यांच्या प्रचारासाठी गेले होते. त्यामध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा प्रचार करत होते. त्यावेळी त्यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर सामनातून देखील शिंदेंना टोला लागावला होता.
संजय राऊत त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले होते की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिकडे छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा प्रचार करत आहेत. मात्र त्यांनी महाराष्ट्रात लक्ष द्यावं. इकडे मराठा आरक्षणासह इतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासह सामनातून म्हटले गेले होते की, तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत (Telangana Elections) भाजपा उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते.
निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली. कटकारस्थाने करून सत्तेवर आलेला नीरो रोम जळत असताना फिडल हे वाद्य वाजवत बसला होता आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्धवस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी जळजळीत टीका सामनातून ठाकरे गटाने केली आहे.