बारामती दि.२९: जनाई-शिरसाई योजनेच्या पाण्यासाठी सुपे (ता. बारामती) येथे सुरू असलेल्या उपोषणाला खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (दि. 26) भेट दिली. या वेळी एका आजीबाईंनी खा. सुप्रिया सुळे यांचा चांगलाच समाचार घेतला. अजून कितीदा आम्हाला फसवणार? असा थेट सवालच या आजीबाईंनी उपस्थित केला. जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे हक्काचे पाणी नियमितपणे मिळावे, यासाठी सुपे येथे प्रजासत्ताक दिनापासून शेतकर्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांनी बारा मागण्या शासनाकडे ठेवल्या आहेत. दरम्यान, या उपोषणाला खासदार सुळे यांनी भेट दिली. त्या वेळी एका आजीबाईंनी त्यांना चांगलेच सुनावले. ‘पाणी कधी देणार? अजून किती फसवणार?’ असे सवाल या आजीबाईंनी खा. सुळे यांना विचारले.
याशिवाय त्यांनी खा. सुळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. ‘विचार करा आमचा गरिबांचा, शेतकर्यांचा. कितीदा फसवायचे झाले, आज पाणी येईल.. उद्या पाणी येईल… परवा पाणी येईल… पाणी का येत नाही? हे आम्हाला सांगा. तुम्हाला आम्ही फसवल्यावर कसे होईल? तुम्ही वरच्या हुद्द्यावर कसे जाता? मोठे कसे होता? आम्ही तुम्हाला मोठे केले आहे आणि तुम्ही आम्हाला फसवता होय. आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे,’ अशा शब्दांत आजीबाईंनी या वेळी प्रश्नांची सरबत्ती करीत आपला संताप व्यक्त केला.
वर्षानुवर्षे हा भाग पाण्यासाठी टाहो फोडतो आहे. त्यामुळे आता लोकांचा संताप अनावर होऊ लागला आहे.
#सत्यप्रभा न्युज #बारामती