यवतमाळ दि.१७: पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा आणि नेर येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री संजय राठोड हजर होते. मात्र यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी मात्र दोन्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसल्या नाही.
दोन्ही कार्यक्रमात नेत्यांच्या भाषणात पालकमंत्री संजय राठोड यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक झाले. पण त्यांच्या पक्षाच्या खासदार भावना गवळी यांचा उल्लेखही कुणी केला नाही. त्यामुळे खासदार गवळी यांच्या अनुपस्थितीची चर्चा होत आहे. दरम्यान, खासदार भावना गवळी या गुरुवारी यवतमाळ येथील त्यांच्या कार्यालयातच बसून होत्या, अशी माहिती आहे, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाने दिली आहे.
याबाबत खासदार भावना गवळी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ‘मी पाच वेळा खासदार राहिले आहे. पण पक्षाचा माझ्या मतदारसंघात कार्यक्रम होत असताना मला बोलविण्यात आले नाही. जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?’, असे त्या म्हणाल्या, असेही या बातमीत नमूद आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड