मुंबई :दि.२९ नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यानी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे. मोदीभक्त झालेल्या शिंदे गटला आता उद्धव ठाकरे आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. RSS कडून स्क्रिप्ट लिहून दिली जाते, ते वाचण्याचे काम केलं जातं, अशा शब्दात विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. विरोधकांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला. यावरुन जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमालगोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. याला विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला जमालगोटा देण्याचं सोडा, रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची सभा झाली. त्या सभेतून लोक निघून गेले, त्यावर दृष्टी फिरवली, तर लोकांमध्ये आपले स्थान किती आहे, हे समजेल, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
एकनाथ शिंदेंनी लक्षात ठेवावं…
वीर सावरकर जयंती निमित्त संसद भवनाचा कार्यक्रम घेतला तर विरोधकांना याचं वावड का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी लक्षात ठेवावं, सावरकरांचा जयघोष करण्याचा ठाका भाजपने (BJP) घेतला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचे प्रथम स्मारक शिवतीर्थ येथे केले.
हिंमत असेल तर एकनाथ शिंदेंनी…
विनायक राऊत पुढे म्हणाले, दिल्लीत सावरकरांची जयंती केली म्हणून, एकनाथ शिंदे मोठे भक्त झाले, असं नाही. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहे. हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून सावरकरांना भारतरत्न जाहीर करण्यास सांगाव, असं आव्हान राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिले.
शिंदेंना बुद्धीभ्रंश झाला
संसद भवनाच्या कार्यक्रमात काहींनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांना बुद्धीभ्रंश झाला आहे.
विरोधकांचा बहिष्कार नवीन संसद भवनाला नाही. देशाच्या सर्वोच्च सभागृहाचं उद्घाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते झाले असते,
तर काय झालं असतं. दुर्दैवाने या कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना निमंत्रण सुद्धा नाही. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड