हिमायतनगरः शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज रिन्युवल केलेल्या व्यवसाईक अभ्यासक्रमाच्या असंख्य विद्यार्थ्यांचे दुसरे व तिसरे हप्ते प्रलंबित आहेत. शैक्षणिक वर्ष संपून दोन वर्ष संपले तरी अजुन विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.तसेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना दुसरा व तिसरा हप्ता अजुन मिळालेला नाही तर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात २८९७१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असुन आजपर्यंत त्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आपल्याला लाभ मिळेल या आशेवर विद्यार्थ्यांनी इकडुन तिकडुन, उसने पासने पैसे घेऊन कसेबसे आपले शिक्षण पूर्ण केले. काॕलेज संपवुन विद्यार्थी रोजगाराच्या शोधात तर काही पुढील शिक्षणाच्या तयारीत आहेत परंतु आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची असल्याने व स्वाधार योजनेचा लाभ मिळाला नसल्याने विद्यार्थी कर्जाच्या ओझ्याखाली भरडाला जात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण? अनुसुचित जाती प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? असा थेट प्रश्न हिमायतनगर काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष श्री.संतोष आंबेकर यांनी समाजकल्याण विभागाला केला आहे.
समाजकल्याण कार्यालय,नांदेड येथे विचारणा केली तर निधी नसल्याचे कारण सांगुन विद्यार्थ्यांना परत पाठवले जाते.
विद्यार्थ्यांनी शिकावे की समाजकल्याण कार्यालयाच्या चकरा माराव्या हे प्रशासनाने स्पष्ट करावे. तरी आम्हाला विद्यार्थी हितासाठी आक्रमक भुमिका घेण्याची वेळ येऊ नये अशी आमची धारणा आहे.त्यामुळे हा विषय गांभिर्याने घेऊन नांदेड जिल्ह्याचा स्वाधार योजनेचा प्रलंबित निधी त्वरित उपलब्ध करुन देऊन विद्यार्थ्यांना आर्थिक कोंडीतुन मुक्त करावे व त्यांच्या शिक्षणास सहकार्य करावे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनाची भुमिका घेऊ. असेही या निवेदनात म्हटले आहे.
हिमायतनगर तहसिल कार्यालयामार्फत प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग लातुर यांना हे निवेदन पाठवण्यात आले. यावेळी विकास गाडेकर,मारोती गाडेकर,कपील कांबळे,विजय सोनुले,राम चिंतलवाड आदींची उपस्थिती होती. # सत्यप्रभा न्यूज #नांदेड